पहिले पाच: भाग १
Published:
मी मराठी भाषेच्या माध्यमिक शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या पद्धतींवर काही लेख लिहित आहे. हा या लेखांच्या मालिकेतला पहिला भाग ज्यामध्ये मी सध्याच्या “बेस्ट ऑफ फाइव्ह” पद्धतीचा मराठी भाषेवर होणाऱ्या (दुष्)परिणामांचे विश्लेषण करत आहे.
समस्या
मराठी प्रथम भाषा असणाऱ्या शाळांबद्दल बोलूयात. इंग्रजीचा प्रभाव मराठी जनतेवर पडण्याआधी, महाराष्ट्र शासनाने स्वतःचा अभ्यासक्रम इतर बोर्डांच्या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी सौम्य करण्याआधी (हा काळ म्हणजे ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ संकल्पनेआधीचा) मराठी भाषा विषय हा सर्वांत कठीण म्हणून जास्त लक्ष दिला जायचा. मराठी भाषेच्या बोर्डाच्या परीक्षेत पुष्कळ काही न पाहिलेले प्रश्न विचारले जायचे आणि केवळ सुंदर मांडणी व सुरेख हस्ताक्षर अशा गोष्टींना भाषेमध्ये नवनिर्माण करण्यापुढे मोल दिले जायचे नाही. मराठी विषय हा विज्ञान, गणित, इंग्रजी या विषयांपेक्षा अधिक चर्चेचा विषय असायचा.
पण मराठी समाजाने इतर भाषिकांसमोर स्पर्धा करता यावी म्हणून गेल्या एक-दोन दशकांमध्ये मराठी विषय शिक्षणाची दैना करण्यास चालू केली त्या गोष्टीने काळानुसार भयावह परिणाम करावयास सुरू केला. “बेस्ट ऑफ फाइव्ह” मध्ये सहावा विषय म्हणून मराठीचा सर्रास बळी दिला गेला. मराठी हा मूलतः वस्तुनिष्ठ पेपर. त्यामध्ये गुण मिळवणे इतर पाच विषयांपेक्षा - गणित, विज्ञान, इंग्रजी, समाजशास्त्रे आणि द्वितीय भाषा (संस्कृत/ हिंदी, आदी. ) - यांपेक्षा कठीण. काढून पाहिले तर दहावीच्या बोर्डमध्ये ९५% च्यावर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची मराठी विषयातली कामगिरी अतिशय केविलवाणी. जसजशी एक-एक वर्ष सरकत गेली, तसतशी मराठी विषयात गुण मिळत नाहीत म्हणून मराठी भाषेकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत गेलं. पालक, शिक्षक आणि शाळांना देखील बेस्ट ऑफ फाईव्हच्या वास्तवासमोर मराठी-इतर विषयांना प्राधान्य द्यावं लागलं.
आता यावर उपाय म्हणून मराठी पेपरसाठी बोर्डाने नवीन धोरण राबवायला चालू केले आहे. नव्या धोरणात इंग्रजी पेपरप्रमाणे मराठीच्या पेपरमध्ये उतारे वाचून पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा मार्ग करून दिला. माझ्या मते, मराठीवर हा आणखी एक घाला घातला. जी भाषा दोन दशकांपूर्वी गांभीर्याने अभ्यासली जायची ती पैकीच्या पैकी गुण मिळवून कुठल्या न ऐकिवात असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, आयआयटी, नीट परीक्षांच्या तयारीसाठी हीन म्हणून गणवली गेली. शासनाच्या व्यवस्थेकडून भाषेच्या अभिवृद्धीसाठी काम होणे अपेक्षित असता शासनाच्या आणि किंबहुना (स्वतःला समाविष्ट करून) मराठी समाजाच्या दुर्लक्षामुळे तिचा डोळ्यांपुढे ऱ्हास पाहावा लागतोय.
(पुढील भागामध्ये आपण काही उपाय पाहू.)